‘शिक्षक भारती’चा आरोप
नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयाला व्यवसाय शिक्षण हा विषय पर्याय म्हणून देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होते आहे. ‘स्किल इंडिया’च्या नावाखाली आता मराठी शाळांतून हिंदी, इंग्रजी व अन्य माध्यमाच्या शाळांतून मराठी व इंग्रजी या भाषांनाच हद्दपार केले जात असल्याचा आरोप शिक्षक भारतीने केला आहे.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यात व्यवसाय शिक्षण माध्यमिक स्तर योजनेची अंमलबजावणी सुरू होत आहे. त्यामुळे, मराठी आणि हिंदी विषयाला पर्याय म्हणून इतर व्यवसाय विषय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या संदर्भात ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने परिपत्रक काढले आहे. मात्र हे परिपत्रक भाषा शिक्षणाच्या मुळावर येणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

राज्यातील ३५० शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, अन्य शाळांकडूनही माहिती मागविण्यात आली आहे. सरकारच्या परिपत्रकात या शाळांना व्यवसाय अभ्यासक्रम हा कोणत्या भाषा विषयास पर्यायी असेल हे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात त्रिभाषा सूत्रानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी हा प्रथम भाषेसह हिंदी व मराठी या दोन भाषा शिकविल्या जातात. तसेच, मराठी माध्यमासह इतर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये तीन भाषा शिकविल्या जातात. परंतु आता प्रथम भाषेशिवाय इतर द्वितीय व तृतीय भाषेला पर्याय म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.