स्वाती चांदोरकर लिखीत 'हिज डे' कादंबरीचे तृतीय पंथीयांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुंबईत पार पडलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात श्री प्रवीण दवणे, श्री प्रदीप वेलणकर. श्री प्रमोद पवार. श्री चंद्रकांत मेहेंदळे. सौ माधवी बांदेकर, निवेदिका हेमांगी आणि प्रमुख पाहुणे म्हणून ट्रान्स जेंडर संजीवनी मधुरी शर्मा, व विकी शिंदे उपस्थित होते. श्री प्रवीण दवणे यांनी त्यांचे विचार यावेळी व्यक्त केले. 'हिज डे' कादंबरी ट्रान्सजेंडर, त्यांच्या वेदना क्लेश समस्या ह्यावर आधारित असून ती सत्य आणि काल्पनिक ह्यांची गुंफण आहे. कादंबरीचे प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस ने केले आहे. "तृतीय पंथी लोकांबद्दल आज पर्यंत लिखाण झालेले नाही असे नाही. लोकांना त्याच्या बद्दल जाणूनं घेण्याची इच्छा असते परंतु त्यांच्याबदल भिती वाटते, म्हणून लोक त्यांना टाळतात. त्यामुळे या आधुनिक जगात ते समाजापासून दुरावलेले आहेत. मला त्यांच्या समस्या, जगण्याची धडपड, तडजोड, वेदना, व्यथा याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. तसेच समाजाकडे असलेल्या त्यांच्या मागण्या लोकांपर्यंत पोहोचवणं मला गरचे वाटलं. यासाठी जे जे काही त्यांच्या कडून समजले ते मी ह्या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व प्रसंग जरी काल्पनिक असले तरी त्याला सत्याची साथ आहे. त्यांना चांगल आयुष्य हवं आहे. आणि ह्या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचे एकाच मागणं आहे. 'आम्हाला माणूस म्हणून जगू द्या' मी त्यांचे हेच मागणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न 'हिज डे' ह्या माझ्या कादंबरीतून केला आहे.", यावेळी बोलताना पुस्तकाच्या लेखिका स्वाती चांदोरकर यांनी भावना व्यक्त केल्या. स्वाती चांदोरकर ह्या सुप्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांच्या कन्या असून त्यांची या पूर्वी युथनेशिया, पवित्रम, एक पायरी वर, फॉरवड अँड डिलीट, अनाहत उत्खनन, शेष, विक्रमादित्य हरला, निर्वाण उपनिषद कादंबरी प्रसिद्ध झाली असून, गोल गोल राणी, सेलिब्रेशन, काळाकभिन्न आणि विक्रमादित्य हरला कथासंग्रह मीरेच्या प्रेमतीर्थावर, मीरा एक वसंत आहे, मीरेची मधुशाला, मीरा श्यामरंगी रंगली, मृत्यूचे अमरत्व, मृत्यायुषी, नानक संसारी संन्यस्त, नानक सूर संगीत एक धून, नानक निरंकारी कवी, नानक परमात्म्याचा नाद ओमकार असे ओशोंचे अनुवादित साहित्य तसेच वपु हे चरित्र व वेक्तिचरित्र ही प्रसिद्ध झाले आहेत. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असलेल्या तृतीय पंथीयांकडूनच उपस्थितांना तृतीय पंथीयांच्या समस्या जाणून घेता आल्या. तसेच कार्यक्रमाची सांगता तृतीय पंथीयांनी सादर केलेली लावणी, मुजरा आणि बधाईने करण्यात आली.