इंटरनेटवरील मराठीच्या वापरात वाढ इंग्रजीची मक्तेदारी असलेल्या इंटरनेटवर भारतीय भाषांनी अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे. याचा प्रभाव इतका झाला की, जाहिरातदारही डिजिटल माध्यमांवर भारतीय भाषांमधील जाहिराती देणे पसंत करू लागले आहे. यामुळे येत्या काळात माहितीच्या महाजालात भारतीय भाषेने ज्ञानभाषेला आव्हान दिले आहे. देशात मौखिक संभाषणासाठी भारतीय भाषांचा सर्वाधिक वापर होतो. याचबरोबर लिखित संभाषणासाठी विशेषत: समाजमाध्यमांवरील भारतीय भाषांचा वापर वाढू लागला आहे. मौखिक संभाषणासाठी मराठी भाषेचा वापर करणाऱ्यांची संख्या आठ कोटी ९० लाख आहे, तर लिखित संभाषणासाठी मराठीचा वापर करणाऱ्यांची संख्या ६ कोटी ४० लाख इतकी आहे. महाजालात भारतीय भाषांचा वापर करणाऱ्या भारतीयांमध्ये ९९ टक्के भारतीय मोबाइलवरून इंटरनेट वापरणारे आहेत. तर महाजालात उपलब्ध असलेल्या माहितीपैकी भारतीय भाषांमधील माहिती अधिक खात्रीलायक असल्याचे ६८ टक्के भारतीयांना वाटते. आजमितीस देशात भारतीय भाषांमध्ये तामिळ भाषेचा सर्वाधिक ४२ टक्के वापर होतो, तर त्याखालोखाल हिंदी, कानडा, बंगालनंतर मराठीचा वापर ३४ टक्के होतो. यापैकी ३५ टक्के लोक बातम्यांसाठी आणि सरकारी कामांसाठी भारतीय भाषांचा वापर करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे, तर इतर वेळी इंग्रजीचा वापर करणारी मंडळी मनोरंजनासाठी भारतीय भाषांचा वापर करत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०२१ मध्ये भारतीय भाषांचा सर्वाधिक वापर होणार असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सर्वामुळे जाहिरातदारही डिजिटल माध्यमांमध्ये भारतीय भाषांना प्राधान्य देऊ लागले आहेत. महाजालावरील भारतीय भाषांचा वापर हा बाजारात नवी समीकरणे तयार करणारा असेल असे व्हटरेझ या डिजिटल जाहिरातीसंबंधितील कंपनीचे संस्थापक आशीष शाह यांनी सांगितले. नेटकरांची संख्या वधारली देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. याचबरोबरीने या महाजालात भारतीय भाषांचा वापर करणाऱ्यांचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत इंटरनेटवर भारतीय भाषंचा वापर करणाऱ्या नेटकरांची संख्या चार कोटी २० लाखांहून थेट २३ कोटी ४० लाखांवर पोहोचली आहे. यामुळे आजमितस देशात महाजालात इंटरनेटचा वापर करणाऱ्या २३ कोटी ४० लाख भारतीयांपुढे इंग्रजीचा वापर करणाऱ्यांची संख्या तोकडी झाली आहे. महाजालात केवळ इंग्रजीचा वापर करणाऱ्यांची संख्या १७ लाख ५० हजार इतकी आहे. २०२१ मध्ये हे प्रमाण ५३ कोटी ६० लाखांवर पोहोचेल, अशी अपेक्षा गुगल आणि केपीएमजीने प्रसिद्ध केलेल्या ‘इंडियन लँग्वेज डिफायनिंग इंडियाज इंटरनेट’ या अहवालात नमूद केले आहे.