मराठी पालक संमेलनात चर्चासत्रातील सूर इंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे पालक आणि पाल्यांमध्ये संवादाची पोकळी निर्माण होत आहे. तसेच सामाजिक प्रतिष्ठेपायी मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यात येत असून त्याचा ताण मुलांवर येत आहे. हे टाळण्यासाठी मराठी माध्यमाचाच आग्रह धरावा आणि आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्याच शाळांमध्ये घालावे, असा सूर मराठी पालक संमेलनातील चर्चासत्रात रविवारी व्यक्त करण्यात आला. मराठी अभ्यास केंद्र आणि नूतन विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मराठी पालक महासंमेलनातील ‘मातृभाषेतील शिक्षण’ या चर्चासत्रात हा सूर व्यक्त झाला. या चर्चासत्रात अभिनेत्री-दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी, प्रकाशिका सई तांबे, अॅड. मीनल शृंगारपुरे, अभियंता ओंकार गिरकर, मानसोपचारतज्ज्ञ प्रेरणा महाजन, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. चंदा बिराजदार हे वक्ते सहभागी झाले होते. सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि स्पर्धेत आपला पाल्य टिकून राहावा याकरिता मुलांना इंग्रजी शाळेत घातले जाते, पण त्याचा ताण मुलांवर येतो. गावातही इंग्रजी शाळा आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा घराजवळ असल्या तरी मुलांना इंग्रजी शाळेत घातले जाते. त्या प्रवासाचाही ताण विद्यार्थ्यांवर येतो, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले. तर पाल्याला इंग्रजी माध्यामात घातल्यानंतर पालक आणि पाल्यामध्ये एक प्रकारच्या संवादाची पोकळी तयार होते. त्याचा धोकादायक परिणाम होऊ शकतो, असे मत अॅड. मीनल शृंगारपुरे यांनी व्यक्त केले.