बुधवारी पावसाने मुंबईला झोडपल्यानंतर आजही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याने मुंबई जलमय झाली आहे. रस्ते तसंच रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना समोर आले आहेत. दरम्यान पेड रोड येथे भूस्खलन झालं आहे. बुधवारी रात्री पेडर रोड येथे जमीन खचली असून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तसंच पेडर रो़डवर पडलेलं झाडही हटवण्याचं काम सुरु आहे. मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली असून गेल्या चार तासात ३०० मिमी पाऊस झाला असल्याची माहिती महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. मुंबईत काल विक्रमी पावसाची नोंद झाली असून आपण याआधी इतका पाऊस कधीच पाहिला नव्हता असं इकबाल चहल यांनी म्हटलं आहे. दरम्यान जे जे रुग्णालयात शिरलेलं पाणी पंप लावून बाहेर काढण्यात आलं असून रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असल्याची माहिती इकबाल चहल यांनी दिली आहे. मुंबईत मुसळ’धार’; मोडला ४६ वर्षांचा विक्रम मुंबई, ठाणे परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस मंगळवारीही अधूनमधून विश्रांती घेत हजेरी लावत होता. मात्र, बुधवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला आणि मुंबई, ठाण्यात दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आणि वाहतुकीचे सर्वच मार्ग पाण्याने रोखले. मुंबईत तब्बल १४१ ठिकाणी झाडे कोसळली. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर पाणीगळती रोखण्यासाठी झोपडय़ांवर घातलेले प्लास्टिक उडून गेल्याचं पाहायला मिळालं. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं. तर अनेक ठिकाणी ट्रेन आणि गाड्याही अडकल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे एनडीआरएफ आणि आरपीएफच्या जवानदेखील बचावकार्यात उतरले होते. दरम्यान, मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या ४६ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडल्याचं पाहायला मिळालं. कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यात तब्बल ४६ वर्षांनंतर १२ तासांमध्ये २९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. कुलाबा परिसरात १९७४ च्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक २६२ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर बुधवारी या ठिकाणी २९३.८ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, एकूण परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला.