शनिवारी मुंबईत काही ठिकाणी किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले असले, तरी दिवसभरात कमाल तापमानात वाढ झाली असून, रविवारपासून तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आता उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवडाभरात मुंबईचे कमाल तापमान ३० अंशापेक्षा आणि किमान तापमान २० अंशापेक्षा कमी राहिले होते. शनिवारी सांताक्रूझ येथे किमान तापमान १६.६ अंश, पवई १५ आणि पनवेल येथे १४.५ अंश से. नोंदविण्यात आले. मात्र सायंकाळी कमाल तापमानात वाढ होऊन सांताक्रूझ येथे पारा ३४.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार तापमानातील वाढ ही यापुढे कायम राहण्याची शक्यता आहे.

शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशपर्यंत खाली गेले होते. कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली, तर मध्य महाराष्ट्रात किंचित घट झाली.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.६ अंश सेल्सिअस होते. कमाल तापमानात राज्यभरात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.