* रहिवाशी-विकासक यांच्यातील वादाला हिंसक वळण * विकासकावर ‘अॅट्रॉसिटी’खाली गुन्हा घाटकोपर पूर्व येथील जुन्या रमाबाई आंबेडकरनगरमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबविण्यावरून स्थानिक रहिवाशी व विकासक यांच्यातील वादाला हिंसक वळण लागले. या योजनेतील गैरप्रकाराबद्दल आवाज उठविणाऱ्या स्थानिक रहिवाशांना विकासकाच्या गुंडांनी पोलिसांच्या समक्ष मारहाण केली. त्यात राम तुपेरे हा सामाजिक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आर्यमान डेव्हलपर्सचे मुकेश पटेल व इतर ११ जणांवर पंतनगर पोलिस ठाण्यात ‘अॅट्रॉसिटी’खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात गुरुवारी नगरसेवक मनोज संसारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी चिंतामण गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली रमाबाई नगरमधील ४०-५० रहिवाशांनी मंत्रालयात गृहमंत्री आर.आर.पाटील यांची भेट घेऊन रहिवाशांना धाकदपटशा दाखविल्याची तसेच एसआरए योजना बेकायदेशीररित्या राबिली जात असल्याची तक्रार केली. पोलीसांचीही त्यांना साथ असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिल्याची माहिती संसारे यांनी दिली. रमाबाईनगरमध्ये गेल्या २५-३० वर्षांपासूनचे जुने तीन बुद्ध विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा आहे. विकासकाने नियोजित एसआरए योजनेत त्यांचा समावेश केलेला नाही. त्याचबरोबर या वसाहतीत रहात नसलेल्या काही लोकांची नावे पात्रता यादीत घुसवली आहेत. तसेच अद्याप या योजनेला परवानगी मिळाली नसताना झोपडय़ांच्या भोवती पत्र्यांचे कुंपण घालण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याला रहिवाशांचा विरोध आहे. विकासकाच्या दडपशाहीच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी उपोषण सुरू केले. परंतु पोलिसांच्या समोरच त्यांना विकासकाच्या हस्तकांनी मारहाण केली. तुपेरे यांच्यावर चाकू व ब्लेडने हल्ला करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पात्रता यादीत नावे घुसवल्याचा आरोपरमाबाईनगरमध्ये गेल्या २५-३० वर्षांपासूनचे जुने तीन बुद्ध विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा आहे. विकासकाने नियोजित एसआरए योजनेत त्यांचा समावेश केलेला नाही. त्याचबरोबर या वसाहतीत रहात नसलेल्या काही लोकांची नावे पात्रता यादीत घुसवली आहेत. तसेच अद्याप या योजनेला परवानगी मिळाली नसताना झोपडय़ांच्या भोवती पत्र्यांचे कुंपण घालण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याला रहिवाशांचा विरोध आहे.