महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात आपल्या जीवाला धोका असल्याच्या तक्रारीचे पत्र त्यांनी पोलिसांना पाठवले आहे.

अज्ञातांकडून आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे. अनधिकृत विकासकामांच्या विरोधात भुमिका घेतल्याने आपल्याला या धमक्या येत असून त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

सामंत म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असून याबाबत मी पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहीले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन महिन्यांपूर्वी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. आम्ही म्हाडामध्ये चांगलं काम करतो आहोत. इथल्या बिल्डर आणि दलालांची लॉबी आम्ही मोडीत काढली. त्यामुळेच त्यांचा कदाचित माझ्यावर राग आहे.

माझ्या पोलीस आयुक्त आणि महासंचालकांवर विश्वास आहे. मात्र, माझ्या मनातील भिती त्यांच्यासमोर प्रत्यक्ष मांडण्यासाठी मी त्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर यावर योग्य निर्णय घेतील अशी मला आशा आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे.