बारावीनंतर वैद्यकीय प्रवेशासाठीच्या एमएच-सीईटी परीक्षेतील निगेटिव्ह गुणांकन पद्धती रद्द करण्याच्या निर्णयापाठोपाठ या परीक्षेतून ‘नीट’चा अतिरिक्त अभ्यासक्रम वगळण्याचा महत्त्वाचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने घेतल्यामुळे या परीक्षेला बसणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुमारे सव्वा लाख विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक मुलांना याचा लाभ मिळेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.mu01

२०१२ पर्यंत एमएच – सीईटी ही परीक्षा केवळ बारावीच्या अभ्यासक्रमावर घेण्यात येत होती. २०१३ साली सरकारने ‘नीट’चा मार्ग अवलंबिला व अकरावी-बारावी तसेच सीबीएससी-एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित ७२० गुणांची परीक्षा लागू केली. तसेच नकारात्मक गुणांकन पद्धतीचा वापर केला गेला. याचा फटका राज्य बोर्डाच्या लाखो विद्यार्थ्यांना बसला. प्रामुख्याने ग्रामीण भागात एनसीआरटीची पुस्तकेही उपलब्ध नसतात व शिकविण्यासाठी अध्यापकांची वानवा असते हे लक्षात घेऊन २०१४ साली ‘नीट’ पॅटर्न रद्द करण्यात आला. त्यापाठोपाठ वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नकारात्मक गुणांकन पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, परीक्षा पद्धतीत अकरावी-बारावीच्या बरोबरीने सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील दहा टक्के भाग कायम ठेवला. परिणामी ७२० गुणांपैकी जवळपास ८८ गुणांचे प्रश्न या सीबीएससीच्या अतिरिक्त अभ्यासक्रमातून विचारण्यात येणार असल्यामुळे त्याचा फटका राज्य बोर्डाच्या सव्वा लाख मुलांना बसण्याची भीती निर्माण झाली. पुण्यातील प्राध्यापक दिलीप शहा, तसेच अभाविपचे पदाधिकारी आणि काही पालक संघटनांनी बारावीच्या परीक्षेनंतर सीईटीच्या परीक्षेसाठी केवळ ४५ दिवसांचा वेळ असून त्यात सीबीएससीचा अतिरिक्त दहा टक्के अभ्यास करणे कठीण असल्याचे तसेच याचा मोठा फटका बोर्डाच्या विद्यार्थ्यांना बसल्याचे आकडेवारीने दाखवून दिले.
विनोद तावडे यांनी याचा आढावा घेऊन एमएच-सीईटी परीक्षा यावर्षीपासून केवळ अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमावरच घेण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. गेली दोन वर्षे संपूर्ण देशपातळीवर अकरावी-बारावीचा अभ्यासक्रम समान पातळीवर आणण्यात आलेला असल्यामुळे राज्य बोर्डाच्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.