आदर्श अहवालावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वपक्षातील नेत्यांना फटकारले असतानाच केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पुन्हा एकदा आदर्श घोटाळ्यावर भाष्य केले आहे. आदर्श घोटाळ्यात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग आहे. विधीमंडळात आदर्श घोटाळ्यावर चर्चा होणे गरजेचे असून प्रसारमाध्यमांमधून या घोटाळ्याची सत्यस्थिती जनतेसमोर मांडावी असे मत मिलिंद देवरा यांनी मांडले आहे.
आदर्श घोटाळ्याचा अहवाल मंत्रिमंडळाने फेटाळल्याने सत्ताधारी काँग्रेसवर टीका होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही यावरुन काँग्रेसची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी आदर्श अहवाल न दाबता त्यावर उत्तर द्याव अशा आशयाचे ट्विट केले होते. यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही आदर्श अहवाल फेटाळण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाशी असहमत असल्याचे जाहीर वक्तव्य करत राज्यातील काँग्रेस नेत्यांना दणका दिला होता. यानंतर रविवारी मिलिंद देवरा यांनी पुन्हा आदर्श अहवालावर भाष्य केले आहे. आदर्श घोटाळ्यात सर्वपक्षीय नेते असल्याने विरोधकांनीही विधीमंडळात अहवालावर चर्चा करण्यासाठी सत्ताधा-यांना साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.