मुंबईतील १२ गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यास तातडीने सुरुवात करावी, मृत कामगारांच्या वारसाहक्काचा प्रश्न सोडवण्यासाठी तोडगा काढावा आणि गेल्यावर्षी ‘म्हाडा’तर्फे कामगारांसाठी काढण्यात आलेल्या ६९२५ घरांच्या सोडतीमधील सर्व घरांचे वाटप १४ ऑगस्टपर्यंत करावे, या मागण्यांसाठी गिरणी कामगार २८ जून रोजी पुन्हा एकदा मोर्चा काढणार आहेत.
गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी  २८ जून २०१२ रोजी ‘म्हाडा’ची सोडत निघाली. त्यातील ३०० कामगारांना घराचा प्रत्यक्ष ताबा मिळाला. बाकीची ताबा प्रक्रिया सुरू असली तरी ती कधी पूर्ण होणार याची ‘म्हाडा’कडे योजना नाही. घरांच्या वाटपाची प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर पुढील पाच वर्षांतही ती पूर्ण होणार नाही, अशी टीका गिरणी कामगार संघटनांच्या समन्वय समितीने केली आहे.
शिवाय सरकारकडे आजमितीस १२ गिरण्यांची जमीन उपलब्ध आहे. तरीही या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यास सुरुवात झालेली नाही. सरकार त्यात विलंब करत आहे. तर खटाव मिल आणि बॉम्बे डाईंग मिलच्या मालकांनी अद्यापही जमीन सरकारकडे जमा केलेली नाही. सरकारने आता हस्तक्षेप करून ती जमीन तातडीने ताब्यात घ्यावी, अशी मागणी दत्ता इस्वलकर यांनी केली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे भाडेतत्त्वावरील योजनेत बांधण्यात येत असलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे गिरणी कामगारांसाठी देण्यात येतील असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले होते. पण त्याबाबतचा आदेश अद्याप निघालेला नाही. त्यामुळे आता गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर २८ जून रोजी पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर कामगार एकत्र जमतील, असे इस्वलकर यांनी सांगितले.