गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असे आश्वासन पुन्हा एकदा राज्य सरकारकडून देण्यात आल्यानंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर आयोजित करण्यात आलेला गिरणी कामगारांचा मोर्चा रद्द झाला. तसेच घरांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर गिरणी कामगारांच्या नेत्यांची २५ जानेवारीला बैठक होणार आहे. म्हाडाच्या लॉटरीत लागलेली घरे कामगारांना तातडीने मिळावीत, गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळावीत, या मागण्यांसाठी पाच कामगार संघटनांतर्फे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ या निवासस्थानी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कामगार नेत्यांबरोबर मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत दिले. तसेच २५ जानेवारी रोजी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.