उत्तर प्रदेशातून पळवून मुंबईत आणलेल्या एका १६ वर्षीय मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. आरोपींच्या तावडीतून सुटका करवून घेतल्यानंतर या मुलीने पोलीस ठाणे गाठले आणि तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली.  पीडित १६ वर्षीय मुलगी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात राहणारी आहे. १६ ऑगस्ट रोजी काही अज्ञात इसमांनी तिचे घराजवळून अपहरण केले. त्यानंतर लखनऊ येथील एका लॉज मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर तिला मुंबईत आणले. मुंबईत आपल्याला देहविक्रीच्या व्यवसायात टाकतील अशी त्या मुलीला भीती होती. अखेर दादर येथे या मुलीने संधी मिळताच आरोपींच्या तावडीतून पलायन केले. त्यानंतर तिने बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे गाठले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात सामूहिक बलात्कार, अपहरण आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.