मिशन बिगिन अगेन अंतर्गत मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत. तरीही करोनाचा धोका मात्र टळलेला नाही ही बाब नागरिकांनी विसरु नये. राज्य सरकारने अनेक परवानग्या दिल्या आहेत. कोविड १९ या महामारीचा धोका कायम आहे. अशा स्थितीत आपण सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे या गोष्टी पाळणं आवश्यक आहे असं पोलीस उपायुक्त प्रणय अशोक (ऑपरेशन्स) यांनी हे आवाहन केलं आहे. मुंबईवर करोनाचा धोका कायम आहे. सुरक्षेचे नियम पाळा असंही पोलिसांनी म्हटलं आहे. राज्य सरकारनी जे निर्देश आखून दिले आहेत त्यांचं पालन केलं आहे. घराबाहेर फिरताना मास्क लावणं अनिवार्य आहे. मार्केट, शॉप्स, बार्बर शॉप्स सुरु ठेवण्याची संमती देण्यात आली आहे. दोन किमीच्या आतच या ठिकाणी जावं असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. व्यायाम करण्यासाठी संमती देण्यात आली आहे. त्यासाठीची मर्यादाही दोन किमीच आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अनिवार्य आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे. रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी कायम आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मेडिकल इमर्जन्सी असेल तरच संचारबंदीच्या काळात बाहेर पडता येईल. जे लोक नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असाही इशारा पोलिसांनी दिला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून या सगळ्या निर्देशांचे पालन करावे असं आवाहनही करण्यात आलं आहे.