भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटवरुन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. राज ठाकरेंनी आपल्या औपचारिक ट्विटवर हॅण्डलवरुन बाबासाहेबांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी, "स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, ह्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणं हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल," असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये #महामानव हा हॅशटॅगही वापरला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, ह्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणं हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल. #महामानव pic.twitter.com/FdLAEAYQIg — Raj Thackeray (@RajThackeray) December 6, 2019 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महापरिनिर्माण दिनानिमित्त परळमधील बीआयटी चाळीला भेट दिली. बीआयटी चाळ येथील एका इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १९१२ ते १९३४ या कालावधीत या ठिकाणी वास्तव्यास होते. बाबासाहेब राहिलेल्या याच घराला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. आंबेडकर यांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. उद्धव आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं.