'किती चौकशा करायच्यात त्या करू द्या, माझं तोंड बंद ठेवणार नाही, मी बोलतच राहणार. असा राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. ईडीकडून चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर घरी परतल्यावर राज यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीने कार्यालयाने समन्स बजावलं होतं. त्यानंतर आज राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात आले होते. साडेआठ तास त्यांची चौकशी सुरु होती. उन्मेश जोशी, राजेंद्र शिरोडकर यांना जे प्रश्न विचारले गेले त्याच संदर्भातले प्रश्न ईडीने घेतल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांना पुन्हा चौकशीसाठी सामोरं जावं लागणार की नाही? हे स्पष्ट व्हायचे आहे. गरज पडल्यास राज ठाकरेंना पुन्हा बोलवण्यात येईल असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी जी काही उत्तरं दिली आहेत ती समाधानकारक आहेत असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मीडियाशी कोणताही संवाद न साधता ते कृष्णकुंज या ठिकाणी म्हणजेच त्यांच्या निवासस्थानी ते रवाना झाले होते. शर्मिला ठाकरे, उर्वशी ठाकरे, अमित ठाकरे हे वेगळ्या गाडीतून कृष्णकुंजवर गेले. उद्या राज ठाकरे यांना बोलवण्यात आलेले नाही असे ईडीच्या अधिकाऱ्यानी स्पष्ट केले. मात्र गरज पडल्यास राज ठाकरे यांना पुन्हा बोलवण्यात येईल असंही ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी चौकशीसाठी पूर्ण सहकार्य केले असंही ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. १२ वाजता त्यांची चौकशी सुरु झाली. त्यानंतर रात्री सव्वा आठच्या सुमारास राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर आले. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही या ठिकाणी दाखल झाले होते. बाहेर आल्यानंतर त्यांनी मीडियाकडे पाहून फक्त स्मितहास्य केले आणि कारमध्ये बसून कृष्णकुंज या निवासस्थानी निघून गेले. साडेआठ तासांच्या चौकशीत राज ठाकरे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे प्रश्न विचारले त्याची समाधानकारक उत्तरं राज ठाकरे यांनी दिली. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यालयाबाहेर आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मुंबईतील काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.