महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील शिवाजी पार्कवरून मोदी मुक्त भारत ही घोषणा केली. तत्पूर्वी, आपल्या भाषणात मुंबई-अहमदाबाद मार्गावरील गुजराती पाट्यांबाबत राज ठाकरे यांनी भाष्य केले होते. त्यांच्या या भाषणानंतर आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी खळखट्याक आंदोलन करत रात्री उशिरा मुंबई-अहमदाबाद मार्गावरील हॉटेल-दुकानांवरील गुजराती पाट्या हटवल्या. घोषणा देत सुमारे १० ते १२ कार्यकर्त्यांनी या पाट्या हटवल्या.

मुंबईतील शिवाजी पार्कवर पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या चिरपरिचित आक्रमक शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरात, अभिनेता अक्षयकुमारवर हल्लाबोल केला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अजूनही अनेक दुकान आणि हॉटेलवर गुजराती पाट्या असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. त्यांच्या भाषणानंतर काही मनसैनिक एकत्रित येऊन राज ठाकरे आणि मनसेविषयी घोषणा देत या हॉटेलांवर हल्लाबोल आंदोलन केले. त्यांनी या हॉटेलवरील गुजराती भाषेतील पाट्या हटवल्या.

‘मोदी’मुक्त भारतासाठी सर्व विरोधीपक्षांनी एकत्र यावं; राज ठाकरेंचे आवाहन

राज ठाकरे यांनी मोदींवर हल्ला करताना महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवले जात असल्याचा आरोप केला. वसई-विरारमध्ये गुजराती लोकांची संख्या वाढतेय. हा मोदी-शहा जोडगळीचा डाव असल्याचे ते म्हणाले. बीकेसीतील नोकऱ्या मोदींनी गुजरातला पळवल्या. मी गुजरात दौऱ्यावर असताना मोदींनी माझ्यासमोर चांगलं चित्र उभे केले. मात्र, ते खोटे होते. मोदींचा खरा चेहरा आता दिसला असून त्यांनी गुजरातची वाट लावली आहे, असा आरोप करत आजही मुंबई-अहमदाबाद मार्गावरील अनेक दुकान आणि हॉटेलवर मराठी ऐवजी गुजराती पाट्या असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला होता.