“महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,” अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या लेखातून साद घालण्याचा प्रयत्न केला. पण संजय राऊत यांच्या भूमिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “महाभारतामध्ये कर्णाच्या रथाचं चाक जेव्हा जमिनीत रुतलं होतं तेव्हा कृष्णाने कर्णाला जो प्रश्न विचारला तोच प्रश्न मला आज शिवसेनेला विचारायचा आहे. अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म कर्णा?” असे संदीप देशपांडे रविवारी या लेखावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले. त्यानंतर आता त्यांनी टि्वट केले आहे.

आणखी वाचा- ‘अभिमन्यू एकटा लढत होता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म कर्णा?’ ‘रोखठोक’ला संदीप देशपांडेंचं ‘मनसे’ उत्तर

“विचार,संयम’ स्वाभिमान या मुळे “ब्रॅण्ड”मजबूत होत असतो. या उलट तडजोड,लाचारी यामुळे व्यवसाय तर होतो पण ब्रॅण्ड रसातळाला जातो” असे संदीप देशपांडे म्हणाले.

आणखी वाचा- महाराष्ट्रात ‘ठाकरे ब्रँड’चा जोर हवा, संजय राऊत यांची राज ठाकरेंना भावनिक साद

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात ‘मुंबईचे खच्चीकरण कोणासाठी! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची!!’ हा लेख लिहिला. ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरेही ठाकरे या ब्रँडचेच घटक आहेत. या सगळ्याचा फटका त्यांनाही भविष्यात बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.