महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या मोठे बदल घडवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. २३ जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मनसे पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. मनसे अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवत मनसेकडून तसे संकेतही देण्यात आले आहेत. दरम्यान, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलं आहे. अळूचं फदफदं हवं की मिरचीचा ठेचा? असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे. "मंत्रालयातील गोड गोड अळूचं फदफदं आवडतं की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी. निर्णय तुमचा… ।। मराठा तितुका मेळावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।’ असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. मंत्रालयातील गोड गोड अळूच फदफद आवडत की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी निर्णय तुमचा.. ।। मराठा तितुका मेळावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 21, 2020 संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसैनिकांना मनसेत प्रवेश करण्याचं आवाहन केल्याचं बोललं जात आहे. मनसेच्या चिन्हात आता फक्त इंजिन!..कोणता झेंडा घेणार राज हाती? मनसे अध्यक्ष राज ठाकरे 23 जानेवारी रोजी काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र ते त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलणार हे नक्की झालंय कारण त्यांच्या पक्ष चिन्हातून झेंडा काढण्यात आला आहे आणि फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आलं आहे. MNS Adhikrut या ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता फक्त रेल्वे इंजिनच दिसतं आहे. त्यामुळे निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग असलेला मनसेचा झेंडा बदलणार हे निश्चित मानलं जातं आहे. मात्र त्याचसोबत राज ठाकरे कोणता झेंडा हाती घेणार? हा प्रश्नही उपस्थित होतो आहे. बॅनरही ठरले होते चर्चेचा विषय विचार महाराष्ट्र धर्माचा निर्धार हिंदवी स्वराज्याचा असं मनसेचं पोस्टर १७ जानेवारी रोजी झळकलं होतं. तसंच १७ जानेवारीच्या सकाळी शिवसेना भवनाच्या समोर राज ठाकरे महाराष्ट्र धर्म सम्राट या आशयाचं पोस्टरही लावण्यात आलं होतं. या दोन पोस्टर्सची चर्चा पुढचे दोन दिवस चांगलीच रंगली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे अशी चर्चा रंगली आहे. हा अवकाश भरुन काढण्यासाठी राज ठाकरे पुढाकार घेतील अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात ते काय भूमिका घेणार हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.