प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने प्रसिद्ध गायक-संगीतकार अदनान सामी यांना 'पद्मश्री' हा किताब जाहीर केला आहे. मात्र, अदनान सामी यांच्या पद्मश्रीला शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध दर्शवला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी यासंदर्भात ट्विटद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहे. मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये,हे मनसे च ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा ही मनसेची मागणी आहे. — Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 25, 2020 मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी म्हटले की, अदनान सामी हे मूळचे पाकिस्तानी नागरिक असून त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना भारताचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले. मात्र, त्यानंतर मोदींच्या दुसऱ्या सरकारच्या कार्यकाळात त्यांना लगेच पद्मश्रीने कसे काय गौरविण्यात येते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे. २०१५ मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? — Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 25, 2020 दुसऱ्या एका ट्विटमध्ये खोपकर म्हणतात, मोदी सरकारने अदनान सामी यांना दिलेला पुरस्कार परत घ्यावा. तसेच आपली मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपण याचा विरोध करीत राहणार असे त्यांनी म्हटले आहे.