मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर वेळ पडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज ठाकरे वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राजभवनात पोहोचले होते. “सरकार आणि राज्यपालांचं फार सख्य असल्याने विषय किती पुढे जातील कल्पना नाही. पण ते सरकारसमोर गोष्ट मांडतील,” अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

“नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ सांगितलं, पण अजून तो होत नाही. राज्यपालांशी बोलल्यानंतर त्यांनी एकदा शरद पवारांशी बोलून घ्या सांगितलं. मी पवार साहेबांशीही बोलणार आहे. मला वाटतं हा विषय राज्य सरकारला माहिती आहे. लोकांना जिथे २००० बिल येत होतं तिथे १० हजार बिल येत आहे. राज्य सरकारला माहिती आहे तर मग प्रकरण कशात अडकलं आहे कळत नाही,” अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

“याचा निर्णय तात्काळ घ्यायला पाहजे. त्याच्यासाठी पहिलं निवेदन राज्यपालांना दिलं आहे. शरद पवारांशी फोनवरुन किंवा प्रत्यक्षात जाऊन चर्चा करणार. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांना भेटणार. हा विषय त्यांना माहिती नाही असं नाही. अर्थात त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली की त्यावर काम सुरु आहे सांगतात पण त्यावर निर्णय होत नाही,” असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

“लोकांना येणाऱ्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. गेली अनेक दिवस माझा पक्ष, कार्यकर्ते प्रकरणी आंदोलन करत आहेत. याप्रकरणी अदानी, बीएसटीचे लोक भेटून गेले. वीज बिल आम्ही कमी करु शकतो पण एमईआरसीने आम्हाला मान्यता दिली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. पक्षाचं एक शिष्टमंडळ जाऊन एमईआरसीच्या लोकांना भेटून आले. त्यांच्याकडन लेखी स्वरुपात पत्र आलं. कंपन्या वीज बिलं कमी करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. आमचं त्यांच्यावर दडपण नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एका बाजूला कंपन्या एमईआरसीकडे बोट दाखवत आहेत, दुसरीकडे एमईआरसी आमचं काही दडपण नाही म्हणतायत,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.