अंधेरी पूल दुर्घटनेनंतर आता या मुद्यावरुन राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या जुन्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ फेसबुकवर पुन्हा पोस्ट करताना बुलेट ट्रेनवरुन सरकारला कोंडीत पकडले आहे. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर राज ठाकरेंनी ३० सप्टेंबर २०१७ ला एक पत्रकार परिषद घेतली होती. तोच व्हिडिओ राज यांनी पुन्हा पोस्ट केला आहे. राज यांनी त्यावेळी १ लाख कोटींच्या बुलेट ट्रेनची गरज काय ? असा प्रश्न केला होता. आता अंधेरीतील दुर्घटनेनंतर सामान्य मुंबईकर तोच प्रश्न विचारत आहेत असे राज यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. रेल्वेच्या एकूणच सुरक्षिततेचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ अनिल काकोडकर ह्यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीच्या अहवालानुसार सिग्नल यंत्रणेपासून, पुलांचं नूतनीकरण करण्यासाठी २०१२ ते २०१७ ह्या कालावधीत १ लाख कोटींची गुंतवणूक करायला हवी असं अहवाल सांगतो. पण आधीच्या काँग्रेस सरकारने आणि आत्ताच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हा अहवाल बासनात गुंडाळून ठेवला. शहरांचं नियोजन पार कोलमडलेलं आहे, सध्याच्या पायाभूत सुविधांची साधी डागडुजी करायला सरकारच्या सरकारच्या खिशात दमडी नाही आणि तरीही हजारो,लाखो कोटींच्या अवास्तव प्रकल्पांच्या घोषणा केल्या जात आहेत असे राज त्यावेळी म्हणाले होते. मुंबईसारख्या शहरातील पायाभूत सुविधा आधी नीट व्हावी यासाठी जनमताचा दबाव तयार करायलाच हवा असे राज यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.