कोणत्याही परिस्थितीत मला ३० सप्टेंबपर्यंत गटाध्यक्षांची यादी सादर करा. जे पदाधिकारी यादी सादर करणार नाहीत त्यांना पदावर ठेवायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असा सज्जड दम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यशवंत नाटय़गृहात राज्यातून बोलाविलेल्या विभागाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला होता. मात्र  १ ऑक्टोबरला मनसेच्या दादरच्या मुख्यालयात केवळ मुंबईतील एक दोन विभागातूनच काहीशे गटाध्यक्षांची यादी जमा झाल्यामुळे आता राज काय करणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
एरवी प्रसारमाध्यमांना आवर्जून अमंत्रण असते. मात्र या सभेच्यावेळी यशवंत नाटय़गृहात आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बाहेर जायला सांगण्यात आले होते. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या या सभेत, ‘तुम्ही खाली पक्षबांधणी करा, मते आणण्याची व तुम्हाला सत्तेपर्यंत नेण्याची जबाबदारी माझी’ असे राज यांनी जोरात सांगितले होते. त्याचप्रमाणे गटाध्यक्षांची नियुक्ती एक महिन्यात करून त्यांच्या याद्या सरचिटणीस शिरीष सावंत, पाटील व फडके यांच्याकडे राजगड मुख्यालयावर जमा करण्याचा ‘आदेश’ त्यांनी दिला. याद्या तयार करण्यासाठी मतदारांची यादी असलेल्या सीडी तसेच कशा स्वरुपात माहिती द्यायची याचा फॉर्मही त्यांनी दिला होता. मतदारसंघातील बुथनिहाय गटाध्यक्ष नेमायचा असून त्याचे नाव मतदार यादीत असणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
संपूर्ण राज्याचा विचार करता एकूण ८० हजार बुथ असून तेवढे गटाध्यक्ष नेमणे अपेक्षित होते. मुंबईतील ३६ मतदारसंघात सुमारे सुमारे साडेसहा हजार गटाध्यक्ष, ठाण्यात बाराशे ते बंधराशे, पुणे येथे अडीच हजार आणि नाशिकमधील विधानसभेचे तीन मतदारसंघ लक्षात घेता एक हजार गटाध्यक्षांची यादी ३० सप्टेंबपर्यंत राजगडावर सादर होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात केवळ मुंबईतील एक-दोन विभाग अध्यक्षांनीच आपल्या विभागातून गटाध्यक्षांची यादी राजगडवर सादर केल्याचे मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारपूर्व पहिल्या फेरीत राज्यातील सेनेच्या दृष्टीने महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात गटप्रमुखांचे मेळावेही घेतले. तर दुसरीकडे राज यांनी आदेश व वेळेचे बंधन घालूनही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना गटाध्यक्षांच्या नेमणुकाही अद्यापि करता आलेल्या नाहीत. मनसेचे आमदार, सरचिटणीस व उपाध्यक्षांनी विभागाध्यक्षांना नेमके काय सहकार्य केले असा सवाल काही विभागअध्यक्षांनी केला.