सायन- पनवेल महामार्गावरील खड्ड्यांवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून सोमवारी सकाळी अकरा वाजता मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण - डोंबिवली या भागांमध्ये सध्या खड्ड्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे. सायन- पनवेल हायवेवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून हे खड्डे अपघातासाठीही कारणीभूत ठरु लागले आहेत. एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनीही तीन दिवसांपूर्वी येथील रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी केली होती. त्यावेळी युद्धपातळीवर दुरुस्ती केली जाईल असे आश्वसन दिले होते. मात्र जे काम सुरु आहे ते नित्कृष्ट दर्जाचे असून पावसातही ते वाहून जात आहे, अशी तक्रार वाहनचालक करत आहेत. महामार्गावरील खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक झाली असून सोमवारी सकाळी ११ वाजता मनसेने खळखट्याक आंदोलन केले. या आंदोलनाला मनसेने 'सर्जिकल स्ट्राईक' असे म्हटले आहे. तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची मनसैनिकांनी तोडफोड केली. कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे, प्रवीण पोटे आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी या प्रकरणात मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावरुन मनसेचे @mnsadhikrut 'खळ् खट्याक्', नवी मुंबईमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय फोडले अधिक अपडेट्स वर pic.twitter.com/FNbkLyVapu — LoksattaLive (@LoksattaLive) July 16, 2018 '१२०० कोटी खर्च करून सायन पनवेल महामार्ग बांधण्यात आला असून त्यावर टोलही आकराला जात आहे. या महामार्गांवरील खड्ड्यामुळे आत्तापर्यंत पाच जणांचे बळी गेले आहेत. या प्रशासनाला आणि युती सरकारलला जाग आणण्यासाठी आम्ही हे सर्जिकल स्ट्राईक आंदोलन केले, असे मनसेचे ऐरोलीतील विधान सभा अध्यक्ष संदीप गलुगडे यांनी सांगितले.