जून २०२० पासून मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत ८२७ मोबाइल लंपास मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेतून टाळेबंदीच्या काळात प्रवास करणाऱ्या अत्यवश्यक सेवेतील प्रवाशांना मोबाइल चोरांनी हिसका दाखविला असून जून २०२० पासून आतापर्यंत रेल्वे प्रवासादरम्यान ८२७ मोबाइलची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. मोबाइल चोरीची सर्वाधिक नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असून त्यापाठोपाठ सीएसएमटी, कुर्ला, बोरिवलीसह अन्य पोलीस ठाण्यांचा क्रमांक लागतो. मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत पाकीट, मोबाइल चोरीच्या घटना घडत असतात. प्रवासादरम्यान मोबाइल चोरीचे प्रमाण अधिक आहे. रुळांजवळील खांबाच्या मागे उभे राहून लोकलच्या दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांच्या हातातील मोबाइल हिसकावून चोर पळ काढतात, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. मार्च २०२० पासून टाळेबंदी लागताच मुंबई उपनगरीय रेल्वे बंद ठेवण्यात आली. जूनपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू झाली. त्यावेळी प्रवासी संख्या कमी होती. त्यानंतर हळूहळू प्रवाशांची संख्या वाढत गेली. त्याचबरोबर मोबाइल चोरांचा सुळसुळाटही वाढला. जून २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर ८२७ मोबाइल चोरीच्या घटना घडल्या असून या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सर्वाधिक गुन्हे कल्याण लोहमार्ग पोलीस हद्दीत झाले असून या पोलीस ठाण्यात १०५ गुन्ह््यांची नोंद झाली आहे. तर कु र्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात ७४, सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात ९४, वसई रोड पोलीस ठाण्यात ८५, मुंबई सेन्ट्रल ६३ आणि बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात ५४ मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. ८४५ गुन्ह्यांची उकल जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये पाच हजार ८९ मोबाइल चोरीला गेले असून ८४५ गुन्ह््यांची उकल झाली आहे. जानेवारी ते मार्च महिन्यांतच सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटना घडल्या. त्यानंतर टाळेबंदीमुळे लोकल सेवा बंद होती. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू होताच काही महिने ओळखपत्र तपासणीसाठी रेल्वे स्थानक हद्दीत रेल्वे पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. परंतु कालांतराने विविध श्रेणींना प्रवासाची परवानगी दिल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत बदल झाले आणि पुन्हा हळूहळू चोरीचे प्रमाण वाढले.