शेतक-यांना कर्ज पुनर्गठन न करता त्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करत विरोधकांनी आजच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.  उद्यापासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.
शेतकरी आत्महत्यांबाबत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. सरकारमध्ये सामील असलेल्या दोन्ही पक्षातच संवाद नसल्याची टीका त्यांनी शिवसेना भाजपवर केली.
विनोद तावडे, पंकजा मुंडे व बबनराव लोणीकर या मंत्र्यांवरील गैरव्यवहारांचे आरोप, काही ज्येष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडील गृह खात्याच्या कारभाराबद्दल व्यक्त केलेली नाराजी, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी, असे एकाहून एक स्फोटक विषय विरोधकांजवळ असले तरी विरोधी पक्षात बसण्याची व सरकारवर प्रहार करण्याची मानसिकता अजूनही काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये रुजलेली नसल्याने या संधीचा लाभ विरोधक कसे उठवितात हे सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातच दिसून येणार आहे.  तसेच, आमदार राज पुरोहित यांच्या कथित ध्वनिफितीमुळे आधीच कोंडी झालेल्या भाजपच्या तीन मंत्र्यांच्या स्टिंग ऑपरेशनचा भांडाफोड सभागृहात करणार असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केल्याने ते मंत्री कोण, अशी उत्सुकता आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून काँग्रेसने वातावरण तापविल्याने उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय गाजण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेणे सत्ताधारी भाजपसाठी अवघड असले तरी दुसरीकडे आर्थिक परिस्थितीमुळे हा निर्णय घेणे सोपे नाही, असा पेच सत्ताधाऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.