गेल्या आठ महिन्यांत २० हून अधिक नवउद्योगांना कुलूप

महाविद्यालयात शिकत असताना किंवा नुकतीच पदवी मिळाल्यानंतर ताबडतोब एखादी संकल्पना घेऊन त्या आधारे निधी मिळवून व्यवसाय सुरू करायचा, हा नवा विचार आयआयटी, आयआयएमसारख्या बडय़ा संस्थांमधील विद्यार्थ्यांनी रुजवला. यातूनच देशातील अनेक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नवउद्योग सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकत्याच नवउद्यमींसाठी विविध योजना जाहीर केल्या. पण प्रत्याक्षात मात्र हे नवउद्योग फार काळ टिकत नसल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत देशातील २० नवउद्योगांना कुलूप लावण्यात आले असून, यांपैकी ११ उद्योग केवळ जून व जुलै या दोन महिन्यांत बंद पडले आहेत.

गेल्या पंधरा वर्षांच्या काळात देशात नवउद्योगांचे वारे वाहू लागले आहे, मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये जगभरातील कंपन्यांकडून आणि सरकारकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे नवउद्योगांना बळ मिळाले आणि ते बडय़ा कंपन्यांचा हात धरून उभे राहू लागले. पण जेव्हा स्वत:च्या पायावर उभे राहायची वेळ आली तेव्हा अनेकांचा तोल गेला. यामुळेच गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत २०० हून अधिक नवउद्योगांना कुलूप लागल्याचे समोर आले आहे.

हायपर लोकलला घरघर

गेल्या आठ महिन्यांत २० कंपन्या बंद झाल्या असून त्यांपैकी पाच या हायपर लोकल गटातील आहेत. या गटाची अवस्था  बिकट असून गेल्या दीड वर्षांत या गटातील तब्बल १००हून अधिक कंपन्या बंद पडल्या आहेत. झोमॅटो, ओलासारख्या कंपन्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून या कंपन्या स्थानिक पातळीवरील सेवा पुरविण्याचे काम करतात.

देशात ४०० हून अधिक हायपर लोकल नवउद्योग असून गेल्या पाच वर्षांमध्ये या गटात तब्बल एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. यापैकी १९३ कंपन्यांना २०१५-१६ या कालावधीत निधी मिळाला आहे. मात्र या ४०० हून अधिक कंपन्यांपैकी केवळ २७३ कंपन्या कार्यरत असून १०० हून अधिक कंपन्या बंद पडल्या आहेत.

अपयश का?

भारतात नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. याचबरोबर गुंतवणुकदारही सढळ हस्ते गुंतववणूक करण्यास तयार आहेत. मात्र तरीही देशातील कंपन्यांना अपयश का येते हा मोठा प्रश्न तज्ज्ञांसमोर आहे. याचा विचार करत असताना देशातील बहुतांश नवउद्योग हे दुसऱ्या कोणत्या तरी संकल्पनेवर आधारित असतात हे निरीक्षण आहे. तर अनेकदा हे उद्योग गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडतात. तर बऱ्याच कंपन्या तात्पुरत्या समस्येवर तोडगा काढतात, मात्र त्याचा भविष्यात काय वापर होऊ शकतो याचा विचार ते करताना दिसत नाही. यामुळे बहुतांश कंपन्या अपशी होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

जानेवारी ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत बंद पडणाऱ्या नवउद्योगांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१६च्या पहिल्या सहामाहीत नवउद्योगांसाठी चांगल्या प्रमाणात भांडवल उभे

राहिले. या कालावधीत तब्बल ५३८ नवउद्योगांना २.४ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा निधी मिळाला असून त्यापैकी २५३ नवउद्योगांना दुसऱ्या तिमाहीत एक अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका निधी मिळाला आहे. हे चित्र सकारात्मक असले तरी दुसरीकडे कंपन्या बंद होणे सुरूच आहे.