टाळेबंदीमुळे महाराष्ट्रातील महामार्ग व अन्य रस्त्यांवर ट्रक, कंटनेर इत्यादी अवजड वाहने मोठय़ा संख्येने थांबली आहेत. याची संख्या सुमारे अडीच लाखांहून अधिक असून काही चालकांचे मोठे हाल होत आहेत. चालकांची खाण्यापिण्याची सुविधा, आरोग्य असे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. याबाबतचा आढावा विविध मालवाहतूक संघटनांकडून दर दोन दिवसांनी घेतला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे टाळेबंदी संपताच जीवनावश्यक वस्तू, कंपन्या, कारखाने यांच्यासाठी आवश्यक असलेली मालवाहतूक सेवा पूर्ववत होण्यासाठी मात्र थोडा कालावधीही जाईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. ५५ वय असलेले चालक सयाजी मोहिते हे मुंबईतून नागपूरला ट्रक घेऊन ९ मार्चला गेले. तेथून अमरावतीला गेल्यानंतर कपडय़ाचा धागा घेऊन पुन्हा मुंबईला परतणार होते. मात्र टाळेबंदी होताच २३ मार्चपासून ते अमरावतीतील मूर्तिझापूर येथेच थांबून आहेत. यासंदर्भात मोहिते यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून ट्रक रस्त्याच्या कडेलाच उभे के ल्याचे सांगितले. जवळच्याच एका धाबा मालकाकडून जेवणाची सुविधा करण्यात आली. मात्र ट्रकमध्येच झोपण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातच सोबतच मालाची चिंता लागून राहिली ती वेगळीच. खाण्या-पिण्याचे हाल होत असून आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटायझर किं वा मास्कही नाही. टाळेबंदी १४ एप्रिलला संपली तरच येथून निघू शकतो. टाळेबंदी वाढली तर पुढे काय असा प्रश्नही पडल्याचे मोहिते म्हणाले. मूळ गाव सातारा असलेल्या मोहिते यांना त्यांच्या घरच्यांकडूनही फोनवरून परत येण्यासंदर्भात सातत्याने विचारणा केली जात आहे. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्य़ांत जवळपास १५ हजार ट्रक, टेम्पो, कं टनेर अडकले आहेत. राज्यात हीच संख्या दोन ते अडीच लाख आहे. यासंदर्भात दर दोन ते तीन दिवसांनी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेल्फे अर असोसिएशन, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस यासह अन्य संघटनांशी व्हिडीओ कॉन्फरन्समार्फत चर्चा केली जाते. चालक, क्लीनर यांना जेवणाची सुविधा पुरवण्यासंदर्भात आढावा घेतला जातो. राज्य शासनाकडेही चालकांना मदत देण्यासंदर्भात मागणी केली आहे. - अशोक पाटील, सदस्य,बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन. राज्यात अडीच लाखांहून अधिक वाहने रस्त्यांच्या कडेला थांबलेली असून तेथे चालक, क्लीनरसाठी सोयीसुविधा पाठवणे अशक्य आहे. तरीही प्रत्येक वाहतूक मालक, संघटना आपापल्या चालकाशी संपर्कही ठेवून आहे. देशभरात तर ३ लाख ५० हजार वाहने ही विविध कं पन्या, कारखान्यांच्या बाहेर माल घेऊन आहेत. चालकांना सुविधा पुरवण्याबरोबरच यावर तोडगा काढण्याची मागणी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे. - बाल मल्कित सिंग, अध्यक्ष, कोअर कमिटी व माजी अध्यक्ष ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट, (काँग्रेस)