किचकट अटींमुळे आधुनिक बसतळांच्या निविदेला प्रतिसाद नाही; १५ स्थानकांवर आधुनिक व्यापारी संकुल प्रसाधनगृहांची बिकट अवस्था, स्थानकात असलेली दुर्गंधी, प्रवाशांसाठी व चालक-वाहकांसाठी आरामदायी नसलेल्या आराम कक्ष व माहितीचा अवाभ. एसटीच्या स्थानकांवर असलेली ही परिस्थिती बदलण्यासाठी आधुनिक बस तळांसह व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. १५ स्थानकांवर सर्वात महत्त्वाचा आणि बिग बजेट प्रकल्प असलेला हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेत यातील प्रथम चार स्थानकांसाठी तीन ते चार महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आली. मात्र किचकट अटींमुळे त्याला प्रतिसादच न मिळाल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. आता २५ सप्टेंबर निविदा दाखल करण्याची शेवटची मुदत असून एसटीला कंपन्यांची प्रतीक्षा असणार आहे. एसटी महामंडळाचा राज्यात मोठा पसारा असून २५० आगार, ५६८ बस स्थानके, १८ हजार बसेस व वर्षांला ६५ लाखांपर्यंत प्रवासी आहेत. मात्र महामंडळाची सद्य:स्थिती पाहता एसटीकडून प्रवासी दुरावत चालला आहे. एसटीपासून गेल्या पाच वर्षांत मोठय़ा प्रमाणात प्रवासी दुरावले. मात्र प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वातानुकुलीत बसेस ताफ्यात दाखल करतानाच ‘विमानतळा’च्या धर्तीवर सुरुवातीला १५ एसटी बस स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आधुनिक बस स्थानकांसह व्यापारी संकुल उभारले जाणार आहे. खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जाईल. प्रकल्पानुसार, येणाऱ्या व जाणाऱ्या बसेसाठी तळघर उभारले जाईल. त्यानंतर साधारपणे त्यावरील पहिल्या मजल्यावर प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जेणेकरून येणाऱ्या व सुटणाऱ्या बसची माहिती येथे त्यांना प्राप्त होईल. त्याला लागूनच एसटीची कार्यशाळाही असेल. प्रवासी तसेच चालक-वाहकांसाठी रेस्ट रूम, प्रवाशांसाठी शॉपिंग मॉल, सिनेमागृह, रेस्टॉरंटही इत्यादी सोयीसुविधाही उपलब्ध असतील. स्थानकाबाहेर पडताच प्रवाशांना तात्काळ टॅक्सी व रिक्षा मिळावी त्याप्रमाणेही रचना करण्यात येईल. १५ एसटी बस स्थानकांपैकी प्रथम बोरिवली नॅन्सी कॉलनी, पनवेल, नाशिक-महामार्ग आणि पुण्यातील शिवाजीनगरसाठी एसटी महामंडळाकडून तीन ते चार महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आली. मात्र त्याला प्रतिसाद मिळालाच नाही. यात एसटीकडून ठेवण्यात आलेल्या अटी व शर्तीमध्ये विकासकाकडून प्रकल्पाचा संपूर्ण खर्च करतानाच साधारपणे ३० वर्षांच्या भाडेतत्त्वानंतर तो विनामूल्य एसटी महामंडळाला हस्तांतरित केला जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे यातून महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडेल. यासह अन्य काही अटी निविदांमध्ये नमूद करण्यात आल्या. किचकट अटींमुळे एसटीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे निविदा भरणाऱ्या कंपन्यांनीही पाठ दाखवतानाच काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. त्यामुळे एसटी महामंडळाला नाईलाजास्तव निविदा भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. बस स्थानकांचे वापरले जाणारे भूखंड क्षेत्रफळ * पनवेल- १६ हजार चौरस मीटर * बोरिवली नॅन्सी कॉलनी-२४ हजार चौरस मीटर * पुणे-शिवाजीनगर- १५,७०० चौरस मीटर * नाशिक महामार्ग-३०,९०० चौरस मीटर * सुरुवातीला ९ स्थानकांवर आधुनिक बस तळ प्रकल्प राबवला जाणार होता. त्यानंतर याची संख्या १३ पर्यंत नेण्यात आली. पुन्हा यात बदल करत आता एकून १५ बस स्थानकांचा विकास केला जाईल. कल्याण, भिवंडी यासह औरंगाबाद-मध्यवर्ती, नांदेड-मध्यवर्ती, अकोला, मोरभवन-नागपूरचा अशा काही बस स्थानकांचा यात समावेश आहे. * यातील सर्व बस स्थानकांचे डिझाइन तयार करण्यात आलेले आहे. पत्येक बस स्थानकामागे १५० कोटी ते ५०० कोटी रुपयांपर्यंतचा खर्च आहे. बस तळाच्या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली होती. परंतु त्याला काही कारणास्तव पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. २५ सप्टेंबपर्यंत निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत असून त्यावेळी किती प्रतिसाद मिळतो ते पाहू. - रणजित सिंह देओल (व्यवस्थापकीय संचालक राज्य परिवहन)