शिक्षण घेण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे वा नोकरीच्या अडचणींमुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्यांसाठी मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यात लवकरच ‘मुक्त शाळा’ सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे शाळेला न जाता घरी अभ्यास करून शिक्षणाचे स्वप्न साकार करता येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. राज्यातील रात्रशाळांना पूर्णवेळ शाळेचा दर्जा देण्याबाबत नागो गाणार, कपिल पाटील, रामनाथ मोते आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेला उत्तर देतांना तावडे यांनी ही घोषणा केली. मुंबईत १३७, नागपूरला ११ पूण्याला १४ अशा राज्यभरात १५० रात्रशाळांमधून १४ हजार ५०० विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. रात्रशाळांच्या समस्यांचा अभ्यास करून उपाययोजना सूचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या संशोधन समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला असून त्यावर लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याबाबतही विचार केला जाईल असे तावडे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे अनेक अडचणींमुळे शाळेत जाणे शक्य नसलेल्या ंमात्र शिक्षण घेण्याची जिद्द असलेल्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून मुक्तशाळा सुरू करण्याची योजना सरकार आणत आहे.