बचावलेल्या कामगाराचा अनुभव; काहींवर मात्र आघात

भटारखाना, हॉटेल, खाद्यपदार्थाच्या दुकानांमध्ये काम करणारे आणि मुंबईत अर्थाजनासाठी आलेल्या अनेक परप्रांतीय कामगारांचा हुसैनी इमारत दुर्घटनेत बळी गेला आहे. यातील बरेचसे कामगार हुसैनी इमारतीच्या तळमजल्यावर राहात होते.

मूळचा काश्मीरचा मोहम्मद अल्ताफ एक महिन्यापूर्वी मुंबईत अर्थाजनासाठी आला होता. त्याच्यासोबत इक्बाल खान (२३), सलीम हुसैन (४१) राहात होते. महिनाभरापूर्वीच हे तिघे हुसैनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहण्यास आले होते. मोहम्मदच्या खोलीत त्याचे आठ-दहा सहकारीही राहात होते.  बुधवारी रात्रपाळी करून गुरुवारी सकाळी साधारण ८.२०च्या सुमारास हे तिघे घरी आले होते. मोहम्मददेखील आंघोळीला जाणार होता. काही कारणासाठी तो खाली उतरला. रस्ता ओलांडून समोरच्या दुकानात आला आणि तितक्यात मागे इमारत कोसळत असल्याचे बघून त्याला धक्काच बसला. खोलीतील इतर जण सकाळी कामावर गेल्याने ते सर्व जण वाचले होते. पण रात्रपाळी करून आलेले इक्बाल आणि सलीम मात्र तिसऱ्या मजल्यावरच होते. य्इमारत पडत असल्याची जाणीव होताच सलीम व इक्बाल त्यांनी दरवाजा तोडून तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. त्यामध्ये दोघांच्या डोक्याला  दुखापत झाली.

तळमजल्यावर मिठाई तयार करण्याच्या कारखान्यात काम करणारा अब्दुल लतीफ  या अपघातात बचावला आहे. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला अब्दुल गेल्या आठ वर्षांपासून या इमारतीच्या तळमजल्यावर मिठाई बनविण्याचे काम करीत आहे. सकाळी ६ वाजताच त्याने मिठाई तयार करण्याचे काम सुरू केले होते. ज्या वेळी इमारत कोसळत होती तेव्हा काही कळत नव्हते, केवळ प्रचंड आवाज माझ्या कानावर येत होती. माझी गोडाऊनमध्येच पळापळ सुरू असताना एका कपाटाजवळ पोहोचताच इमारतीचा वरच्या स्लॅबचा मोठा भाग माझ्यावर कोसळणार तितक्यात कपाट आडवा आल्याने मी बचावलो, असे त्याने सांगितले.

या दुर्घटनेत अंत झालेल्या अनेकाचे स्वप्न अधुरे राहिले आहेत. बिहारच्या बलरामपूर या गावातून मिठाई तयार करण्याचे काम शिकण्यासाठी अब्दुल रेहमान हा १९ वर्षीय तरुण मुंबईत आला होता. मिठाई तयार करण्याचे काम शिकून गावी यवसाय सुरू करण्याचे स्वप्न घेऊन अब्दुल मुंबईत आपल्या मामासोबत खूप मेहनतही करीत होता. मात्र काळाने घात केला आणि हुसैनी इमारत दुर्घटनेत त्याचा अंत झाला.