मुंबईत पहाटेच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १४ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. अद्याप या दुर्घटनेत कुणीही मृत्यूमुखी पडलेलं नाही. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बीकेसी मेन रोड आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे. पहाटे अचानक त्याचा काही भाग कोसळल्यामुळे काही मजूर जखमी झाले आहेत.

जखमींची नावे:

१. अनिल सिंह
२. अरविंद सिंह
३. अझर अली
४. मुस्तफा अली
५. रियाजुद्दीन
६. मुतलब अली
७. रियाझु अली
८. श्रावण
९. आतिष अली
१०. रिलियास अली
११. अझीझ उल हक
१२. परवेझ
१३. अकबर अली
१४. श्रीमांद

 

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर लागलीच अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर पोलीस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी करण्यात आलेल्या बचावकार्यात १४ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यापैकी बहुतेक जण हे उड्डाणपुलाचं बांधकाम करणारे मजूर असल्याची माहिती मिळत आहे.

 

दरम्यान, या घटनेवरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “बिकेसीत बांधकाम सुरु असलेल्या ब्रिजचा भाग कोसळून 14 कामगार जखमी…या घटनेनंतर भिती वाटतेय..सध्या सुरु असलेल्या कामात निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य, निकृष्ट सिमेंट, निकृष्ट दर्जाची पद्धत वापरून MMRDA मध्ये “नवा सिमेंट घोटाळा” तर सुरु नाही ना? खादाडांचा काही भरोसा नाही”, असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.