मुंबईला पर्याय म्हणून निर्माण करण्यात आलेल्या नवी मुंबईला आणि त्यांनतर निर्माण होणाऱ्या तिसऱ्या मुंबईला अर्थात महामुंबई परिसराला जलप्रदूषणाचा वेढा आता हळूहळू घट्ट आवळू लागला असून, नवी मुंबई पालिकेने यावर काही प्रमाणात उपाययोजना शोधल्या असल्या तरी पनवेल व उरण नगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ येथील जलप्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे या भागात राहण्यास येणाऱ्या नागरिकांना उंची किमतीच्या घराबरोबरच शहरातील प्रदूषण मोफत मिळत आहे.
नवी मुंबईला एकेकाळी प्रदूषणाचे शहर म्हणूनच ओळखले जात होते. बडे रासायनिक कारखाने वगळता मध्यम व छोटे कारखान्यांना पश्चिम दिशेला असलेला खाडीकिनारा हाच रासायनिक सांडपाण्यासाठी आधार होता. त्यामुळे ठाणे- बेलापूर मार्गाने जाताना रस्त्यात दिसणारे पावसाळी नाले विविध रंगाने वाहत असल्याचे दिसून येत होते. ती परिस्थिती आता काही प्रमाणात बदलली असून एकत्रित सांडपाणी प्रक्रिया केंद्रामुळे नाल्यातील पाणी निदान पाहण्यासारखे तरी आहे. पनवेल शहरात तर जलप्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून तळोजा एमआयडीसीतील रासायनिक कारखाने आता विष ओकू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील कासाडी, मलंग, गाढी या नद्या प्रदूषणयुक्त झाल्या आहेत. तळोजा एमआयडीसीत आता पाच फूट जमीन खोदल्यानंतर काळ्या पाण्याची तळी लागत आहेत. काही टँकरचालकांनी पनवेल, तळोजा शहरांना सव्‍‌र्हिस सेंटर करून टाकले आहे. उरण तालुक्याला नद्यांचे वरदान नसले तरी अथांग समुद्र लाभला आहे. त्या समुद्राला देखील प्रदूषित करण्यास जेएनपीटीच्या टँक फार्मने हातभार लावला आहे.

मासेमारीला धोका
पालिकेने शहरातील सांडपाण्यासाठी पाच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे ४०० कोटी रुपये खर्च करून उभारली आहेत, पण त्यामुळे जलप्रदूषणातील टक्केवारी कमी झाली आहे. त्यामुळे शहराला ६० किलोमीटर लांबीचा मिळालेला खाडीकिनारा प्रदूषणयुक्त असल्याने येथील जैवविविधता नष्ट पावत असून मासेमारी संपुष्टात आली आहे.