देशाची संवेदनशील व गोपनीय माहिती सार्वजनिक केल्याबद्दल रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबई काँग्रेसतर्फे  शहर व उपनगरातील ९४ पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल करण्यात आली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची भेट घेऊन अर्बण यांना अटक करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

आपल्या देशाची संवेदनशील, गोपनीय तसेच सैन्यांबाबतची गंभीर माहिती अर्णब गोस्वामी यांना अगोदरच मिळते कशी, पंतप्रधान कार्यालय किंवा सरंक्षण खात्यातील काही व्यक्तींकडून ही माहिती पुरविण्यात आली का,  याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जगताप यांनी के ली. त्यावर या संपूर्ण प्रकरणाबाबत कायदेशीर सल्ला घेऊ आणि कायदेशीर बाजू पडताळून पाहू व योग्य ती कारवाई लवकरात लवकर करू, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.