मनसेच्या गुंडांनी परत मारा खाल्ला, असा टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी लगावला आहे. रविवारी विक्रोळीत मनसेचे उपविभागप्रमुख विश्वजीत ढोलम यांच्यासह ४ कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. यावरुन निरुपम यांनी, ‘पुन्हा एकदा मनसेच्या गुंडांनी मारा खाल्ला,’ असे ट्विट करत मनसेला चिमटा काढला आहे. गरिब फेरीवाल्यांच्या पोटावर मनसेच्या गुंडांनी लाथ मारल्यास, समोरुनही तसेच उत्तर मिळेल, असा अप्रत्यक्ष इशारादेखील त्यांनी दिला.

‘काल परत मनसेच्या गुंडांनी विक्रोळीत मार खाल्ला. आमचा हिंसेवर विश्वास नाही. मात्र गरिब फेरीवाल्यांच्या पोटावर मनसेचे गुंड लाथ मारतील आणि तेही पोलिसांच्या समोर त्यावेळी त्यांना असेच उत्तर मिळेल. त्यामुळे मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी,’ असे निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. फेरीवाल्यांच्या मुद्यावरुन याआधीही संजय निरुपम आणि मनसेमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे.

रविवारी विक्रोळीत मनसेकडून मराठी पाट्या लावण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांकडून दुकान मालकांना निवेदन दिले जात होते. त्यावेळी स्थानिक दुकानदार, काँग्रेस कार्यकर्ता अब्दुल अन्सारी आणि त्याच्या १५ ते २० साथीदारांनी त्यांना मारहाण केली. यात मनसेचे विभागप्रमुख विश्वजित ढोलम आणि इतर चौघेजण जखमी झाले. याआधी महिनाभरापूर्वी मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना मारहाण झाली होती. पदाधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभाग अध्यक्षांना ‘कृष्णकुंज’वर बोलावून घेतले आहे.