मोठ्या कालावधीनंतर मुंबई आणि राज्यात पुन्हा एकदा करोना डोकं वर काढताना दिसत आहे. राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मागील दोन दिवसात मोठी वाढ झाली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढलेल्या आकडेवारीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यातच मुंबईत रुग्णांची संख्या वाढली असून, महापौरांनी लॉकडाउन करण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईतील करोना रुग्णवाढीच्या दरात आणखी वाढ झाली आहे. बाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाण ५ टक्के झाले असून, चेंबूरमधील एका वार्डात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाला घ्यावा लागला आहे. मुंबईतील वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.

आणखी वाचा- मुंबईत पुन्हा करोना संकट; चेंबूरमध्ये लॉकडाउन?…

माध्यमांशी बोलताना महापौर पेडणेकर यांनी आपली चिंता बोलून दाखवली आहे. “वाढती रुग्णसंख्या ही चिंतेचीच बाब आहे. बहुतांश लोक मास्कविना लोकलमधून प्रवास करत आहेत. लोकांनी खबरदारी घ्यायला हवी, अन्यथा आपण पुन्हा एकदा लॉकडाऊनकडे जाऊ. लॉकडाऊन लागू करायचा की नाही, हे लोकांवर अवलंबूनआहे,” असं म्हणत महापौरांनी इशारा दिला आहे.

इथे लॉकडाउन लागण्याची शक्यता…

चेंबूरमधील एम-पश्चिम वॉर्डकडून सोसायटी आणि फेरीवाल्यांना करोना चाचणी करण्यात सांगण्यात आलं आहे. येथील सर्वाधिक रुग्ण उंच इमारतींमधील आहेत. इतकंच नाही तर पालिका अधिकाऱ्यांनी करोना रुग्णसंख्या नियंत्रित करण्यासाठी लॉकडाउन लागू केला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एका आठवड्यापूर्वी या वॉर्डमध्ये दिवसाला १५ पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. मात्र आता हे प्रमाण २५ वर गेलं आहे. दिवसाला रुग्णवाढीचा दर ०.२८ टक्क्यांवर पोहोचला असून पालिका अधिकारी यासाठी नागरिकांकडून सर्रासपणे होणारं नियमांचं उल्लंघन यासाठी जबाबदार असल्याचं सांगत आहेत. परिस्थितीची दखल घेऊन पालिकेने निवासी सदनिकांना नोटीस पाठवली असून करोनासंबंधित नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची सूचना केली आहे.