मुंबई आणि उपनगरांत करोना रुग्णसंख्या वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई १ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून, पुन्हा लॉकडाउन लागू होतो की काय अशी चर्चा सुरू असून, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी परिस्थिती बिघडल्यास सर्वात आधी नाईट क्लब बंद करण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईत लॉकडाउन होणार असल्याच्या चर्चा सुरू असून त्यापार्श्वभूमीवर अस्लम शेख यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “गेल्या काही दिवसांपासून नाईट क्लबमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. काही नाईट क्लबवरही कारवाई करण्यात आली आहे. पण त्याने काहीही फरक पडलेला नाही. मुंबईत पहिल्यांदा नाईट क्लब बंद होऊ शकतात, असे संकेत शेख यांनी दिले आहेत.

“मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी करोना आढावा बैठक घेतली होती. जिथं जिथं रुग्णसंख्या वाढत आहेत. त्या ठिकाणी अंशत: लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी आणि इतर निर्बंध लावण्यात येणार आहेत. स्थानिक प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले आहेत. केसेस वाढत राहिल्यास मुंबईतही अंशत: लॉकडाऊन लागू शकतो,” असं त्यांनी सांगितलं.

मुंबई आणि ठाण्यात करोनाचे रुग्णसंख्या वाढी लागली आहे. त्यावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे. या बैठकीत मुंबई लोकल आणि बेस्ट बसेसमधील गर्दीवरबद्दलही चर्चा झाली. तसेच लग्न समारंभांवरही चर्चा झाली. रात्री अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे रात्रीची संचाबंदी लावण्यात येणार आहे,” अशी माहिती शेख यांनी दिली. राज्यात ज्या ज्या ठिकाणी गर्दी होत आहे, त्या ठिकाणी निर्बंध येऊ शकतात. त्याबाबत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. करोना रुग्ण वाढत असले तरी लॉकडाऊन हा त्यावर पर्याय नाही,” असंही शेख यांनी यावेळी स्पष्ट केलं.