जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वकाळात मांसबंदीच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयावरून रान उठल्याने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पालिकेच्या तातडीच्या सभेत मुंबईत घालण्यात आलेली मांसविक्रीवरील चार दिवसांची बंदी उठवून दोन दिवसांवर करण्यात आली. मांसबंदी विरोधात जनमानसात तीव्र भावना उमटल्यामुळे बिथरलेल्या भाजपने शरणागती पत्करत या मागणीला पाठिंबा दिला. त्यामुळे मीरा-भाईंदर पाठोपाठ आता मुंबईतही केवळ दोनच दिवस मांसविक्रीवर बंदी राहणार आहे. मुंबईत १३ व १८ सप्टेंबर या दोन दिवसांची बंदी पालिकेने उठवली आहे. मात्र, ही बंदी पूर्णपणे मागे घ्यायला हवी होती, असे मत मनसेने व्यक्त केले आहे.

पालिकेने दोन दिवस केलेली मांसविक्री बंदी तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी पालिका सभागृहाची शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत विश्वासराव यांनी निवेदनाद्वारे मांसविक्रीवरील चार दिवसांची बंदी दोन दिवसांनी कमी करावी अशी मागणी केली. अखेर पालिकेने १३ व १८ सप्टेंबर या दोन दिवसांची बंदी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून लागू केलेली मांसविक्री बंदी पूर्णपणे उठवावी, असे आवाहन मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.