इच्छामरणाची मागणी करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा इशारा

गिरगावातील झावबावाडीत राहणाऱ्या नारायण आणि इरावती लवाटे या वृद्ध दाम्पत्याने इच्छामरणासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठविले असून येत्या ३१ मार्चपर्यंत इच्छामरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

इच्छामरणाचा कायदा निर्माण होण्यासाठी ८७ वर्षीय नारायण लवाटे १९८७ सालापासून सातत्याने सरकारदरबारी पाठपुरावा करीत आहेत. पत्नी इरावती आणि आपल्याला वेदनारहित मृत्यू यावा, यासाठी इच्छामरणाची वाट पकडून याची सुरुवात आपल्यापासून व्हावी अशी नारायणरावांची इच्छा आहे. त्यामुळे इच्छामरणाचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला असून आता या दाम्पत्याचे लक्ष राष्ट्रपती कार्यालयाच्या प्रतिसादाकडे लागले आहे.

नारायण आणि त्यांच्या ७८ वर्षीय पत्नी इरावती हे झावबावाडीतील लक्ष्मीबाई चाळीत राहतात. एप्रिल महिन्यात लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण होणार असल्याने त्याआधीच दोघांनाही इच्छामरण देण्याची मागणी नारायण लवाटे यांनी केली आहे. या जोडप्याला मूलबाळ आणि जवळचे नातेवाईकही नाहीत. इरावती आर्यन शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होत्या, तर नारायणराव राज्य परिवहन विभागात होते. निवृत्तीनंतर या दोघांचेही जीवन एकाकी झाले असून कोणताही आजार बळावण्यापूर्वी सरकारने इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी या दाम्पत्याने केली आहे. यासाठी त्यांनी २१ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींना पत्र लिहिले असून ९० दिवसांच्या आतमध्ये म्हणजेच ३१ मार्चपर्यंत उत्तर न मिळाल्यास टोकाचे पाऊल उचलावे लागेल, असे या जोडप्याचे म्हणणे आहे. दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया झाल्यापासून बाहेर फिरणे बंद झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक आयुष्य फारसे उरले नसल्याचे इरावती यांचे म्हणणे आहे. देहदानाचा निर्णय घेतला असल्याने आम्ही आत्महत्या करणार नाही. आमच्या देहाचा वैद्यकीय आणि गरजूंसाठी वापर व्हावा, अशी आमची इच्छा आहे. मात्र सरकारने इच्छामरणाची मागणी अमान्य केल्यास आत्महत्येचा विचार करावा लागेल, असे नारायणराव यांनी सांगितले.