डोंगरी येथे केसरबाई इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांता मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सध्या जखमींना जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

मालाड येथील भिंत कोसळून अनेक जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी साडेअकराच्या सुमारास मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग मंगळवाळी कोसळला. दरम्यान, ढिगाऱ्याखाली तब्बल ५० जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. स्थानिकांनी ही इमारत कोसळल्याची माहिती दिली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफची टिम आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल होऊन मदत आणि बचावकार्य सुरू केले होते. डोंगरी येथील तांडेल क्रॉस लेनमधील दुर्घटनाग्रस्त ‘२५ बी, केसरभाई’ इमारतीची जबाबदारी नेमकी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने नोटीस बजावल्यानंतर संबंधित ट्रस्टने २५ सी आणि २५ बी केसरभाई इमारतीची संरचनात्मक तपासणी करून घेतली. या तपासणीत इमारत अतिधोकादायक असल्याचे उजेडात आल्यामुळे म्हाडाने ही इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली. मात्र, आता कोसळलेल्या इमारतीच्या भागाची जबाबदारी म्हाडाने झटकली आहे. असे असले तरी, म्हाडाच्या एकमजली बांधकामावर अनधिकृतपणे उभारलेले तीन मजले कोसळल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. म्हाडा आणि पालिकेकडून टोलवाटोलवी करण्यात येत असली तरी या दुर्घटनेत दोन्ही यंत्रणांच्या अनागोंदीमुळे रहिवासी बळी पडले आहेत.

डॉकयार्ड येथील पालिकेच्या बाबू गेनू मंडईची इमारत कोसळल्यानंतर मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर पालिकेने मुंबईतील इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्याचे आदेश दिले होते. डोंगरीमधील २५ बी आणि २५ सी, केसरभाई इमारतीची संरचनात्मक तपासणी करून घेण्याची नोटीस पालिकेने इमारत मालक आणि रहिवाशांवर बजावली होती. नोटीस हाती पडताच बाई हिराबाई रहिमभाई आलू पारो ट्रस्टने २५ सी / २५ बी इमारतीची संरचनात्मक तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ कंपनीची नियुक्ती केल्याचे पत्र ३१ जुलै २०१७ रोजी पालिकेला पाठविले होते. संरचनात्मक तपासणीअंती ही इमारत अतिधोकादायक असल्याचे उजेडात आले होते. ही इमारत दुरुस्त करण्याऐवजी ती रिकामी करून पाडून टाकण्याची सूचना संरचनात्मक तपासणीच्या अहवालात म्हटले होते. या अहवालाच्या आधारे पालिकेने ७ ऑगस्ट २०१७ रोजी नोटीस बजावून इमारत रिकामी करण्याची सूचना केली होती. भविष्यात दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असेही या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलो होते. तर म्हाडाने २०१८ मध्ये रहिवाशांवर नोटीस बजावून ही इमारत रिकामी केली होती.