पर्यावरण दिन विशेष मुंबईची शान म्हणून ओळखला जाणारा समुद्र आणि किनारपट्टी आणखी काही वर्ष स्वच्छ होण्याची कोणतीही शक्यता नाही. देवनार आगीनंतर पालिकेने घनकचरयासंदर्भात पावले उचलली असली तरी व्यापार-उदीमाच्या दृष्टीने समुद्राकडे पाहण्याचा आग्रह धरणाऱ्या पालिकेने याबाबत ठोस निर्णय घेतलेले नाहीत. मुंबईत पन्नास टक्के घरे झोपडपट्टीत आहेत. त्यात सुमारे ६० टक्के लोकसंख्या उघड्यावर किंवा थेट नाल्यात वाहिनी टाकलेल्या शौचालयांचा वापर करते. शहरातील ४० टक्के मला कोणत्याही प्रक्रियेविना नाल्यावाटे समुद्रात टाकला जातो. तब्बल दहा वर्षांनी कुलाबा येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याची सुरुवात होत असताना पालिकेचा कारभार पाहता आणखी सहा केंद्र सुरू होण्यासाठी किमान दहा ते बारा वष्रे लागण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे ही केंद्र उभारूनही मुंबईच्या समुद्रातील प्रदूषण कमी होणार नाही. मुंबईतील समुद्राचे नियमितपणे परीक्षण केले जाते. सांडपाण्याच्या वाहिन्या समुद्रात पाचशे मीटर ते एक किलोमीटर आत सोडल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबई पालिकेची सांडपाणी प्रक्रिया केंद्र ही कुलाबा, वरळी, वांद्रे, मालाड, भांडुप, वर्सोवा व घाटकोपर येथील सांडपाणी वाहिन्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करणार आहेत. त्यामुळे समुद्रात नाल्यावाटे जाणारया मलावर कोणताही परीणाम होणार नाही. * मुंबईतील किनाऱ्यांवरील कचऱ्याचे आकडेही भयावह * नोव्हेंबर २०१५ ते मार्च २०१६ या काळात उत्तन, गोराई, अक्सा, मढ, वर्सोवा, जुहू, दादर आणि गिरगाव या चौपाट्यांची रीफवॉच मरिन कन्झर्वेशन या संस्थेकडून पाहणी * किनाऱ्यांवर प्लास्टिक पिशव्या सर्वाधिक असल्या तरी त्या जोडीनेच अन्नपदार्थाची पाकिटे, सिगारेट, प्लास्टिक बाटल्या, कप, काचेचे तुकडे, कागद, सिमेंटच्या पॉलिथीन पिशव्याही आढळल्या. * जुहू, वर्सोवा आणि आक्सा हे किनारे अस्वच्छ होते * उत्तन आणि गोराई येथील स्थिती काहीशी बरी होती.