लग्न होऊन एक महिना होत नाही, तोच पतीने पत्नीला लोकले रेल्वेतून ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. हार्बर लाईनवरील गोवंडी परिसरात ही घटना घडली असून, महिलेचा मृत्यू झाला आहे. पत्नीला ढकलून देत असताना लोकलमधील एका प्रवाशी महिलेनं बघितले. त्यामुळे ही घटना समोर आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अन्वर अली शेख असं आरोपी तरुणाचं नाव आहे. त्याचं एका महिन्यापूर्वी पूनम चव्हाण या महिलेसोबत लग्न झालं होतं. पूनमचं हे दुसरं लग्न होतं. तिला पहिल्या पतीपासून तीन वर्षांची एक मुलगी आहे. पूनमने अन्वर शेखसोबत दुसरं लग्न केल्यानंतर ती मानखुर्दमधील चाळीत राहायला आली होती. अन्वर व पूनम दोघेही बेरोजगार होते. छोटी मोठी कामं करून उदरनिर्वाह चालवायचे अशी माहिती समोर आली आहे. आणखी वाचा- मुंबईतील घटना! बदला घेण्यासाठी तिने टाकलं हनी ट्रॅप, पण… ऐनवेळी डाव फिस्कटला सोमवारी (११ जानेवारी) दुपारी तीन वाजताच्या सुमारास पूनम व शेख हे लोकलने प्रवास करत होते. त्यावेळी अन्वर शेखने पूनमला भरधाव लोकलमधून ढकलून दिलं. यावेळी त्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलेनं ही घटना बघितली. त्यानंतर त्या महिलेनं तात्काळ याची माहिती मानखुर्द पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी अन्वर शेख याला अटक केलं. आणखी वाचा- कोलकात्यातून पळालेली महिला सापडली वाशीमध्ये नेमकं काय घडलं? दोघेही लोकलमधून प्रवास करत होते. यावेळी पत्नी पूनम दरवाज्याजवळ असलेल्या खांबाला पकडून उभी होती. काही वेळाने पती अन्वर तिच्या जवळ गेला. त्याने तिला पाठीमागून मिठी मारली. त्यामुळे तिने खांब सोडून दिला व तशीच दारात उभी राहिली. मात्र, काही क्षणातच त्याने तिला मिठीतून सोडले आणि पूनम खाली कोसळली. पूनम पडल्यानंतरही अन्वर मात्र, शांत होता. त्याची काहीच प्रतिक्रिया उमटली नाही. त्यामुळे महिलेला शंका आली आणि तिने सर्व प्रकार पोलिसांना कळवला.