देशात करोनाची साथ सुरू झाल्यापासून मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमानी मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामावर जाण्यासाठी बस, रिक्षा किंवा खासगी वाहने अशा मिळेल त्या मार्गाने मुंबईकरांना कामाच्या ठिकाणी पोहोचावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य मुंबईकरांना देखील लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. राज्य सरकारकमधील मित्र पक्षांच्या नेतेमंडळींनी देखील ही मागणी केली असताना अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबईकरांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आजदेखील मुंबईकरांना दिलासा मिळालेला नाही.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये करोनासंदर्भातले निर्बंध शिथिल करण्याबाबत अंतिम प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यावर येत्या १ ते २ दिवसांमध्ये जीआर काढला जाईल, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, लोकलबाबत अद्यापही निर्णय किंवा निर्बंधातून शिथिलता देण्याचा प्रस्ताव तयार झालेला नसल्यामुळे मुंबईकरांना अजूनही त्यासाठी प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यातील ‘या’ २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार! आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

काय म्हणाले आरोग्यमंत्री?

मुंबईतील लोकलमधून लसीचे दोन्ही डोस झालेल्या नागरिकांना प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील यासंदर्भात आपली भूमिका मांडली होती. तसेच, कोविड टास्क फोर्स आणि राज्याच्या आरोग्य विभागाने देखील याला हिरवा कंदील दिल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत. कारण, लसीचे दोन्ही डोस दिलेल्या नागरिकांचं नियोजन आणि त्यांनाच प्रवासाची मुभा देणं या गोष्टींच नियोजन हे रेल्वे विभागाला करावं लागणार आहे. त्यामुळे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी यावर चर्चा केल्यानंतरच मुख्यमंत्री मुंबईच्या लोकल प्रवासाविषयी अंतिम निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

“चार महिन्यांपूर्वी लागू केलेल्या निर्बंध हळूहळू कमी करण्यात येत आहेत. आमच्या मंत्र्यांनाही वाटत आहे की ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी. रेस्टॉरंटचे तासही वाढवावेत”, अशी भूमिका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मांडली होती.