मुंबईकरांना हुडहुडी ; उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटा

मुंबई, पुणे: शहर आणि परिसरासह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दोन दिवसांत वाढला असून अनेक ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले. उत्तर महाराष्ट्राला शनिवारी थंडीच्या लाटांचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तर आणखी दोन दिवस बोचऱ्या थंडीचा मुक्काम राहील असा अंदाज आहे.

शुक्रवारी राज्यात जळगाव, नाशिक, मालेगाव, पुणे, अहमदनगर आणि औरंगाबाद या ठिकाणी पारा १० अंश सेल्सिअसखाली घसरला. उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि नाशिक जिल्ह्य़ात काही ठिकाणी शनिवारी थंडीच्या लाटांचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तरेकडून येणारे वारे आणि पश्चिम प्रकोपानंतरची (वेस्टर्न डिस्टर्बन्स) परिस्थिती, यामुळे राज्यातील या भागात थंडी वाढली आहे. मुंबई आणि महानगर परिसरात गुरुवारी कमाल तापमानात मोठी घट झाली, त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी कमाल तापमानदेखील घसरले. शुक्रवारी दिवसभरात कमाल तापमान २४.३ अंश नोंदविण्यात आले. मुंबई आणि परिसरात दिवसभर थंड वारे वाहत होते. शुक्रवारी मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट, तर कोकणात तुलनेने उल्लेखनीय घट, मराठवाडय़ात किंचित वाढ झाली. तर विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात अनेक ठिकाणी पारा ११ ते १५ अंश दरम्यान राहीला. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

पुढील दोन दिवसांत मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, तर राज्यभरात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

गारेगार क्षेत्र..

गोरेगाव, बोरिवली, पवई आणि पनवेल या ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअस खाली नोंदविण्यात आले. तर हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रावर चार अंशांची घट होऊन ११.४ अंश किमान तापमान नोंदविण्यात आले. किमान तापमानातील इतकी घट ही २०१३ नंतर प्रथमच दिसून आली. या वर्षीच्या मोसमातील

घसरत्या पाऱ्यामुळे मुंबईकरांनी उबदार कपडे बाहेर काढले. लोकल गाडय़ांमधील पंखे दिवसादेखील बंद राहीले.

प्रमुख शहरांतील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई (कुलाबा) १४.५, सांताक्रूझ ११.४, अलिबाग १२.९, रत्नागिरी १४.१, पुणे ८.२, नाशिक ६.०, नगर ९.२, जळगाव ७.०, कोल्हापूर १४.५, महाबळेश्वर १०.०, मालेगाव ८.२, सांगली १४.०, सातारा १०.२, सोलापूर १५.७, औरंगाबाद ८.१, परभणी १२.७, नांदेड ११.५, बीड १३.३, अकोला १२.४, अमरावती १४.०, बुलडाणा ११.४, चंद्रपूर १६.२, गोंदिया १३.६, नागपूर १५.१, वाशिम १३.६, वर्धा १७.६ आणि यवतमाळ १४.४.