मुंबईत मंगळवारी किमान तापमान १३.७ अंश सेल्सिअसवर स्थिर राहिले. मात्र राज्यातील थंडीची लाट ओसरली असून मुंबईतील तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सांताक्रूझ येथे रविवारी १४.४ अंश से. तर सोमवारी १३.६ अंश से. किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारी राज्यातील तापमानात वाढ झालेली असताना मुंबईतील किमान तापमान मात्र स्थिर राहिले. पुढील दोन ते तीन दिवसात आकाश निरभ्र राहणार असून तापमानात घट होणार नाही. थंडीची लाट ओसरल्याने किमान तापमानात वाढ होईल, असा अंदाज वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.