वर्षानुवर्षे एकाच विभागात, एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याची मागणी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे शुक्रवारी केली. ठराविक कालावधीनंतर बदली करण्याचा नियम असताना आणि बदलीपात्र असूनही महानगरपालिकेतील पदाधिकारी व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचं चित्र मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत दिसत आहे. शहराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या महानगरपालिकेत असं होणं योग्य नाही, असं शेख यांनी पत्रात नमूद केलं आहे.

कर्मचाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करत असल्याचे दिसते. अशाने अनेकदा हे अधिकारी मनमानी पद्धतीने किंवा काही विशिष्ट व्यक्तींचे हितसंबंध जपण्यासाठी काम करत असल्याचे अनेकदा दिसून येते. ठराविक कालावधीनंतर अधिकाऱ्यांची बदली करण्याचा नियम आहे. असे असतानाही बदलीपात्र अधिकाऱ्यांना महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने बदलीचे आदेश दिले जात नाहीत. त्यामुळे काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचंही चित्र आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानी असलेल्या शहराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या महानगरपालिकेत असं होणं बरोबर नाही. त्यामुळे बदलीपात्र अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे.

वर्षानुवर्षे एकाच विभागात आणि एकाच ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी यांची बदली करावी. महत्त्वाची बाब म्हणजे ही प्रक्रिया येत्या १५ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात यावी, अशी मागणीही अस्लम शेख यांनी पत्रातून केली.