बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यासंदर्भात आमदार सुनील प्रभू यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या विनंतीनुसार मुंबई महापालिकेने अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची मुदत १२ ऑगस्ट २०२० रोजी संपणार होती. मुंबई महापालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाते. अभय योजनेअंतर्गत २ टक्के अतिरिक्त शुल्क माफ केले जाते. मुंबईकरांना आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अभय योजनेची मुदत १२ ऑगस्ट २०२० रोजी संपणार होती. परंतु सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.मुंबई महापालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकीवर दरमहा २% अतिरिक्त शुल्क आकारले जाते, ते अभय योजनेअंतर्गत माफ केले जाते.— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 11, 2020 मुंबईमधील बहुतांश व्यवसाय, उद्योग-धंदे, अद्याप सुरू झालेले नाही. तसंच त्यांच्या उपजीविकेची साधनंही उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक कुटुंबं मुंबईबाहेर गावी गेली आहेत. तसंच सामान्य नागरिकांचा विचार करून अभय योजनेला डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे, त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे ईमेलद्वारे केली होती. त्यांच्या या मागणीला मान्यता देत या योजनेला आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.