मुंबई पोलिसांनी अभिनेता ऋतिक रोशनने २०१६-१७ मध्ये सायबर सेलमध्ये दाखल केलेली एक तक्रार क्राइम इंटेलिजन्स युनिटकडे वर्ग केली आहे. ऋतिक रोशनच्या वकिलांनी हे प्रकरण वर्ग करण्यासंबंधी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना विनंती केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या या कृतीनंतर कंगना रणौत चांगलीच भडकली आहे. तिने थेट ऋतिक रोशनला टॅग करत एका छोट्याश्या अफेयरसाठी किती काळ रडणार? असा प्रश्न ऋतिकला विचारला आहे.

कंगनाने नेमकं काय म्हटलं आहे?
“आता ऋतिक रोशनच्या विचित्र गोष्टी पुन्हा सुरू झाल्या आहेत. आमचा ब्रेक अप झाला, त्यानंतर त्याचा घटस्फोटही झाला. तरीही इतक्या वर्षांनीही तो त्याच गोष्टी धरुन बसला आहे. या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार नाही. कोणत्याही महिलेला डेट करण्यासही नकार देतो. जेव्हा मी माझ्या व्यक्तीगत आयुष्यात थोडं धैर्य गोळा करण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा याची नाटकं पुन्हा सुरु होतात. अरे ऋतिक एका छोट्याश्या अफेयरसाठी किती गळा काढशील? ” या आशयाचं ट्विट करत कंगनाने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

ऋतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यात क्रिश सिनेमाच्या दरम्यान प्रेमसंबंध जुळले होते. मात्र पुढे या दोघांचं अफेयर आणि ब्रेक अप दोन्ही गोष्टी जगासमोर आल्या. या दोघांनी एकमेकांवर बरीच चिखलफेकही केली. आता ऋतिकची २०१६-१७ मधली ती तक्रार मुंबई पोलिसांनी त्याच्या वकिलाच्या विनंतीवरुन इंटेलिजन्स विभागाकडे वर्ग केल्याने कंगना भडकली आहे आणि एका छोट्याश्या अफेयरसाठी किती गळा काढणार असा प्रश्न विचारत ऋतिकवर टीका केली आहे.