आजपासून (शुक्रवार) मुंबई पुणे रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या आजपासून धावणार आहेत. मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी या गाड्या १६ ऑगस्टपर्यंत रद्द राहणार असल्याचे यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. लांब पल्ल्याच्या विविध गाड्याही रद्द करण्यात आल्याने प्रवासी मेटाकुटीला आले होते. रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागासह इतर ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे गाड्या रद्द कराव्या लागत असल्याचे स्पष्टीकरण रेल्वेकडून देण्यात आले होते. मात्र, मुंबई-पुणे सेवा पूर्ववत झाल्याने आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. विविध ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागात तसेच मिरज-लोंडा (कर्नाटक) विभागात लोहमार्गावर पाणी येऊन ते खचले होते. तर काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकारही घडले होते. परिणामी गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबई लोहमार्गावरील तसेच अन्य लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. तर पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाडय़ा ११ ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, या त्यानंतर १६ ऑगस्टपर्यंत रद्द ठेवण्याचा निर्णय दुसऱ्याच दिवशी घेण्यात आला होता. Following Mumbai-Pune trains restored to run on 16.8.2019 in proper route. 11010 Pune-Mumbai Sinhagad Exp 11009 Mumbai-Pune Sinhagad Exp 12123 Mumbai-Pune Deccan Queen 12128 Pune-Mumbai Intercity Exp 22106 Pune-Mumbai Indrayani Exp@drmmumbaicr @drmpune — Central Railway (@Central_Railway) August 15, 2019 जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेवरील कर्जत-लोणावळादरम्यान घाट क्षेत्रात दरड कोसळण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडल्या होत्या. त्यामुळे या स्थानकांदरम्यान २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत विशेष ब्लॉक घेऊन कामे करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. परंतु २ ऑगस्टपासून पुन्हा पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत ते लोणावळा भागांत तीन ठिकाणी दरड कोसळणे, पाणी साचून मोठा फटका बसला आणि ३ ऑगस्टपासून मुंबई ते पुणे मार्ग पूर्णपणे बंदच ठेवावा लागला. परंतु आता हा मार्ग पूर्ववत झाल्याने मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.