लोकसभा निवडणुकांच्या देशभरातील निकालाचे प्रतिबिंब मुंबईसह ठाणे आणि कल्याणमध्येसुद्धा पहायला मिळाले. मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला पूर्णपणे नामोहरम करण्यात महायुतीच्या प्रयत्नांना चांगलेच यश मिळाले. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला सपाटून मार खावा लागला होता. मात्र, या निवडणुकीत मुंबईतील दक्षिण-मध्य, उत्तर-पश्चिम आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातील जागांवर विजय मिळवत शिवसेनेने ही कसर भरून काढली. तसेच मुंबईतील उत्तर, उत्तर-मध्य आणि उत्तर-पूर्व मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केले. त्यामुळे मुंबईतील सर्व जागांवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
त्याचप्रमाणे शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा प्रश्न असणाऱ्या ठाणे मतदारसंघात राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांचा पराभव केला. कल्याण मतदरासंघात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना धुळ चारत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी २,५४,००० मतांच्या फरकाने विजय संपादन केला. तर दुसरीकडे भिवंडी आणि पालघर मतदारसंघात भाजपच्या कपिल पाटील आणि चिंतामण वणगा यांनी जवळपास लाखभराच्या मताधिक्यासह विजय संपादित केला.

मुंबईतील विजयी उमेदवार
* उत्तर-पूर्व मतदारसंघातून भाजपचे किरीट सोमय्या तब्बल ३ लाख मतांनी आघाडीवर
* दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसचे मिलिंद देवरा पराभूत, शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा विजय
* उत्तर-पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे गजानन कीर्तीकर १,५०,००० लाख मतांनी विजयी
* उत्तर-मध्य मुंबईतून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव करत पुनम महाजन यांनी १,२५,००० मताधिक्याने विजय संपादन केला.
* उत्तर-मुंबई मतदारसंघातून भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसचे संजय निरूपम आणि आम आदमी पक्षाच्या सतीश जैन यांचा पराभव करत तब्बल ३,००,००० मतांनी विजय संपादन केला.
* दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड यांचा पराभव करत १,३८,०४६ मतांनी विजय मिळवला.

* ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे यांचा २,८४,०००   प्रचंड मताधिक्याने विजयी

* कल्याण मतदारसंघात शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांचा २,५४,०००  मताधिक्याने विजय

* भिवंडी मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील विजयी

* पालघर मतदारसंघातून भाजप उमेदवार चिंतामणी वणगा विजयी